fbpx

ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता

 vr 2B 25289 2529


ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता हा लहान मुलांमधील एक न्युरोलॉजिकल आजार आहे. अनेकदा अशा मुलांना मतिमंद समजले जाते मात्र हा चुकीचा समज आहे. जितक्‍या लवकर तुम्हाला ऑटिझमच्या लक्षणांची जाणीव होईल तितक्‍या लवकर त्याची तीव्रता कमी करण्यास तुम्हाला मदत होईल. स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही, त्यामुळे त्यावर औषध-उपाय करता येत नाही. म्हणूनच गरज आहे ती अशा मुलांना समजून घेण्याची. त्यांच्यातल्या कलागुणांना पारखून ते विकसित करण्याची.
Autismप्रत्येक स्वमग्न मूल म्हणजे एक शाळाच आहे. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता! गुणसूत्रांचे एकत्रीकरण होत असताना जन्मण्यापूर्वीच मुलांच्या मेंदूवर तडाखा बसतो. त्यामुळे त्यांच्या इतर संस्थांवर परिणाम होतो. मज्जा संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, स्नायू संस्था अशा सर्व संस्थांच्या शरीरामधील कार्यपद्धती मेंदूच्या या अवस्थेमुळे कमजोर होतात. त्यामुळे स्वमग्नता हा आजार किंवा रोग नसतो. बाळाची वाढ होत असताना त्याच्या सर्व अवयवांवर कमी-अधिक विकलता येते. मुख्य म्हणजे स्वमग्नतेची लक्षणे वयाच्या तिसऱ्या वर्षी दिसू लागतात. त्यामुळे सुरुवातीच्या वर्षांत ही लक्षणे पालकांच्या लक्षात येणे थोडं कठीण असतं. तीन वर्षांनंतर मूल बोलायचं थांबतं त्यावेळी कानाची तपासणी करून घेऊया, असं पालक ठरवतात. ही बेरा टेस्ट नॉर्मल आल्यानंतरही मूल का बोलत नाही, आपल्या गरजा का सांगत नाही, आंघोळीला, जेवायलासुद्धा प्रतिकार करत राहतं आणि मुख्य म्हणजे आधी पाणी पापा दे, भूर ने, मम्मा, पपा आले इथपर्यंत बोलणारं मूल अचानक बोलणंच बंद करतं. स्वत:च्या गरजासुद्धा बोट दाखवून सांगायला लागतं. त्यावेळी पालकांच्या पायाखालची जमीन सरकते. यापैकी बहुतांश मुले काहीच/ कधीच बोलत नाहीत, तरीही घरातली वडीलधारी मंडळी, आजी-आजोबा सांगत राहतात की, अगं याचे वडीलही उशिरा बोलायला लागले, काही काळजी करू नको. देवधर्म, उपास-तापास, नवस, अंगारे-धुपारे, ताईत या तऱ्हेच्या उपायांचीही सुरुवात होते. मुलांच्या अडचणींवर डॉक्‍टरांची औषधंही सुरू होतात. शाळेची शोधाशोध सुरू होते. यात एक-दोन वर्षे अशीच निघून जातात.
म्हणूनच एक लक्षात घेतले पाहिजे की, ऑटिझम हा रोग नाही की त्यावर औषध-उपाय करून तो लागलीच बरा करता येईल. ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. ती कधीही बरी होणारी नाही. तरीपण प्रत्येक मुलाच्या लक्षणांचा समूह निरनिराळा असतो, त्यामुळे वैयक्तिक अभ्यासक्रमाची वाट पकडावी लागते.
काही वर्षांपुर्वीची परिस्थिती पाहाता, समाजामध्ये या विषयाबद्दल फारच थोडी, नगण्य म्हणावी इतकीच माहिती होती. शिवाय या विषयाची माहिती असणारे लोकही फार नव्हते. त्यामुळे ऑटिझम या विषयाला समाजापर्यंत पोहोचवणे आवश्‍यक होते. संवेदनशील, उत्साही आणि मानसशास्त्राचा थोडाबहुत अभ्यास असणाऱ्या काही लोकांनी मग या विषयाची सखोल माहिती घेत ऑटिस्टिक मुलांशी वागताना-त्यांना सांभाळताना लागणारी काळजी याचा सातत्याने अभ्यास सुरू ठेवला. महाराष्ट्रातील काही समाजसेवकांनी मग यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरूवात केली. अपवादात्मक मुलांसाठी शिक्षण असा काहींचा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांनी ऑटिझमग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले.
आजमितीला ऑटिझमचं आजचं चित्र पाहिलं तर अनेक लोकांच्या प्रयत्नाने त्यांच्या प्रयत्नांमुळेच गेल्या काही वर्षांत या मुलांची प्रगती होऊन ते याप्रकारच्या विविध शाळांमधून पुढे शिकत आहेत.
असे चित्र असले तरीही समाजातील बहुतांश लोक अजूनही असं मानणारे आहेत की, स्पेशल स्कूल हा मुलाच्या व पालकांच्या अस्मितेला एक प्रकारचा धब्बा आहे. या ठाम विचारधारेमुळे अनेक पालक मुलांच्या शाळा बदलत राहून, मुलाच्या शिक्षणात विशेष पद्धती नाकारून मुलांचे नुकसान करतात. अजूनही आपला समाज बहुविध प्रज्ञा याचा स्वीकार करत नाही. पण या सगळ्यात एक जमेची बाजू अशी की, स्वमग्न मुलांना वाढवताना पूर्वी आईला कित्येक तास त्याच्यासाठी द्यावे लागत. त्याच्या अवतीभवती राहूनच त्याच्याकडे लक्ष द्यावे लागे. पण याबाबतील विकसित झालेल्या शाळा आणि इतर बाबी पाहता त्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळतो आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की, स्वमग्न मुलांना तेच तेच म्हणजे रिपीटेटिव्ह काम करायचा कंटाळा येत नाही. उलट त्यांचा मेंदू त्यामुळे शांत राहातो. त्यांना सर्व वस्तू जिथल्या तिथेच ठेवायला आवडतात. असेंब्ली लाइन मध्ये ते खूप तत्पर असतात. हॉटेलमध्ये बेल बॉय, गोल्फ कोर्सवर कॅडी म्हणून किंवा बॉलची ने-आण करणे अशा तऱ्हेची कामे ते आनंदाने करतात, पण आवश्‍यकता आहे ती त्यांना सामावून घेण्याची.
मात्र एका विचाराने खूप त्रास होतो. या मुलांसाठी अजूनही खूप करण्यासारखे आहे, यासाठी स्वयंसेवी वृत्तीने काम करणाऱ्या हातांची कमी आहे. विशेषत: तरुण वर्ग यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. व्यक्ती म्हणून, संस्था म्हणून काही मर्यादा येतात. त्यापलीकडे पोचण्याची गरज आहे. काही शाळांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी या कामात जरूर सहभाग घेतला. पण हे प्रयत्न आभाळ फाटलेले असल्यावर ठिगळ लावण्याइतके कमी आहेत.
समाजातील अनेक जण ऑटिझमग्रस्त मुलांच्या व्यावसायिक सेंटरला भेट देतात, तेथील काम पाहून जातात. पण बऱ्याचदा हे केवळ त्या भेटीपुरतेच मर्यादित राहाते. त्याचे पुढे काहीच होताना दिसत नाही.

Autism-कशी घ्याल तुमच्या ऑटिस्टीक मुलांची काळजी –


तुमच्या मुलामध्ये ऑटिस्टीकचे किंवा ऑटिझमचे निदान झाल्यानंतर पालकांनी खचून न जाता, परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे फार गरजेचे आहे. यासाठी पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दलच्या काही टीप्स –

1. संभाषण वाढवा –


ऑटिस्टिक मुले फारशी इतरांमध्ये मिसळत नाहीत. ती स्वतःच्याच विश्वात रममाण असतात. त्यामुळे अशा मुलांशी संयमाने वागा. त्यांना सतत गोष्टी, गाणी ऐकवा. त्यांच्याशी सतत बोलत राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे ही मुले समाजात मिसळण्यास मदत होईल. यामुळे सारीच परिस्थिती एकदम बदलणार नाही. परंतू काही प्रमाणात सुधारणा नक्की होईल.

2. इतरांबरोबर अधिक मिसळू द्या –


ऑटिस्टिक मुलांना समाजात किंवा इतरांमध्ये मिळून मिसळून राहणे फारसे जमत नाही. त्यामुळे त्यावर विशेष लक्ष द्या. त्यांचा एकलकोंडेपणा दुर करण्यासाठी त्यांना नर्सरी किंवा प्ले स्कुलमध्ये पाठवा. ज्याठिकाणी मुले विविध आकाराच्या रंगांच्या खेळण्यांसोबत खेळतील. यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळेल. तसेच ऑटिस्टिक मुले काही विशिष्ट रंग किंवा आवाज टाळतात. त्याच्याशी संपर्क आल्यास मुले हिंसक बनतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.

3. प्रोसेस्ड अन्नपदार्थ देणे टाळा –


जंकफुड्‌चे सेवन हे मानवी शरीरासाठी अपायकारक आहे. त्यामुळे ऑटिस्टिक मुलांमध्येही जंक व प्रोसेस्ड अन्नपदार्थांचा समावेश टाळा. अशा पदार्थांमुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्‍यता असते.

4. इलेक्‍ट्रॉनिक वस्तू दूर ठेवा –


तुमच्या मुलामध्ये ऑटिझमचे निदान झाले असेल, तर त्यांना टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम अशा वस्तूंपासून दुर ठेवा. कारण अशा उपकरणांच्या वापरामुळे, अशा मुलांचा मानसिक विकास खुंटण्याची शक्‍यता असते. त्यापेक्षा विविध प्रकारची गाणी, चांगले शांत संगीत,बालगीते त्यांना ऐकवा, बौद्धिक विकास करणाऱ्या खेळण्यांचा त्यांना अधिकाधिक वापर करायला द्या. यामुळे त्यांच्या मेंदुला चालना मिळेल.

5. औषधांपेक्षा थेरपी प्रभावी –


ऑटिस्टिक मुलांमध्ये बदल घडवण्यासाठी, औषधांपेक्षा विविध थेरपीच अधिक प्रभावशाली ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. एप्लाइड बिहेव्हिअरल ऍनालिसिस व  स्पीच थेरपी या दोन अत्यंत प्रभावी थेरपी

Leave a Comment

Book Free Test & Trail

Enable Notifications OK -